उद्या सकाळपर्यंतच आपला सहवास
त्यानंतर वेगवेगळ्या वाटा,
अलग व्हायचंच आहे
जशा बहरतील पहाटेच्या छटा...
ही रात्रच हाताशी आहे
तेव्हा दवडू नकोस वेळ,
काहि क्षणांतच संपेल
हा अंधाराचा खेळ...
कोण जाणे उद्या कुठे तू
अन कुठे मी?
नशीब कुठवर नेईल
याची कोण देईल हमी!
तेव्हा हीच वेळ आहे
काहीतरी करूया खास,
आजचा हात धरू
सोडून "उद्या"चा ध्यास...
काहीतरी करूया
आठवणीत राहील असं,
काहीतरी करूया
कधी विसरणार नाही असं...
दे हात तुझा
माझ्या हातात हळुवार,
ये जरा मिठीत
वारा सुटलाय गार...
गोंजारू दे तुझे केस
उगाच चाळा लडिवाळ,
न्याहाळू दे तुझा चेहरा
करुन हातांची ओंजळ...
मिसळू दे माझ्या श्वासांमध्ये
उष्ण श्वास तुझे,
विरघळू दे गुलाबी आसमंतात
मंद उसासे तुझे...
सामावून जा माझ्या कवेत
अधरांवर ठेव अधर,
विसरून दुनीयेला साऱ्या
प्रेमाची बरसात कर...
पाहता पाहता सकाळ होईल
मग व्हायचं आहेच वेगळं,
तेव्हा कसं सोडून चालेल
हे क्षणभंगुर सुख सगळं?
उणीव जाणवेल तुझी
तुला सोडून गेल्यावर,
आठवण सतावेल माझी
मी निघून गेल्यावर...
फक्त डोळे बंद कर तेव्हा
ह्रुदयातून तुझ्या येईल आवाज माझा,
कारण सोडुन जरी गेलो तुला
ह्रुदयात तुझ्या असेल ठिकाणा माझा...
Monday, August 31, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment